TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 26 ऑगस्ट 2021 – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एका प्रकरणात अटक केल्यानंतर जामीन मंजूर झाला आहे. यानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना धमकीवजा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर सडकून टीका केलीय.

सत्तेचा कितीही दुरूपयोग करा. मात्र, भाजपच्या पोकळ धमक्यांना राज्यातील कोणताही नेता घाबरणार नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. भाजपला जे करायचं ते करू द्या, कोणाच्याही विरोधात त्यांनी तक्रार दाखल करावी. नाहीतर खोट्या केसमध्ये अडकून जेलमध्ये ठेवा. सत्तेचा दुरूपयोगही करा,ही काय नवीन गोष्ट नाही, असे म्हणत मलिकांनी भाजपवर निशाणा साधला आहे. याअगोदर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर टीका केली आहे.

भाजप इतका महान पक्ष आहे की तो परग्रहावरील लोकांवरही गुन्हे दाखल करेल. कारण, त्यांच्या हातात यंत्रणा आहे. त्यामुळे ते काहीही करू शकतात, असे म्हणत संजय राऊत यांनीही भाजपवर टीकेचे बाण सोडलेत. मात्र, नितेश राणे यांनी राणेंविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप केलाय.

या दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं होतं. कारण, एका केंद्रीय मंत्र्याला नियमांचा भंग करून अटक केली जाते. जवेणाच्या ताटावरून उठवलं, आम्ही या सगळ्याला करारा जबाब देऊ, असे भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटलं आहे.